Sunday, March 29, 2020

नाभिकांनो, लॉकडाऊन कालावधीत सलूने बंदच ठेवा : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक ३० मार्च २०२० :
                    कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २१ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व सलूने बंद असून लॉकडाऊन असेपर्यंत सर्व नाभिक बांधवांनी आपली सलूने बंद ठेवून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
                    नाभिकांचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. परंपरेने चालत आलेल्या बारा बलुतेदारांपैकी एक असलेला नाभिक आज घरात बसलेला आहे. जिल्ह्यातील सर्व नाभिक आपापल्या परीने घरात थांबून पंतप्रधानांच्या आवाहनांप्रमाणे नियमांचे काटेकोर पालन करत आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या या नाभिक व्यावसायिकांना सध्या आपला व्यवसाय करता येत नसल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारागीर तर अर्धलीवर काम करणारे असल्याने त्यांना तर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. सर्व नाभिक घरात बसून असल्याने प्रसार माध्यमांच्या व विविध संपर्क माध्यमांच्याद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सूचनांचे पालन करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी सलूने उघडी आहेत कि बंद आहेत यावर संघटनेच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.
                     सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेने वारंवार आवाहन करूनही जर ग्रामीण किंवा अन्य भागात सलूने उघडून जर सेवा दिली जात असेल तर संघटनेचा या गोष्टीला कडाडून विरोधच आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये असे काम करणे हे नाभिक संघटनेलासुद्धा मान्य नसून अशा बाबींचे संघटना समर्थन करत नाही. ' कोरोना ' पसरू नये यासाठी घरी बसून सहकार्य करणारे नाभिक त्यामुळे विचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही बहुसंख्य नाभिक बांधव नियमांचे प्रामाणिकपणे पालन करत घरात बसून आहेत. तसेच काही ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांच्या घरी जाऊन सेवा देणे हे देखील संघटनेला अजिबात मान्य नाही. आम्ही ग्राहकांसाठी असलो तरी देशहितासाठी आम्ही या लढ्यात देशासोबतच कायम राहणार आहोत. आमच्या प्रिय ग्राहकांची गैरसोय होत असली तरी आमचा नाईलाज आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिक सर्व ग्राहकांची दिलगिरी व्यक्त करत असून कधी एकदा ग्राहकांना नव्या उमेदीने आरोग्यदायक सेवा देण्यासाठी सज्ज होता येईल याचीच वाट पाहत आहेत.
                       ग्राहक फोन करून नाभिक सेवा देण्यासाठी विनंती करतात म्हणून प्रत्येकाने स्टेटसवर विनंती देखील केलेली दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे फोन येणे बंद झालेले आहेत. आपला नाभिक मित्र कधी एकदा दुकान उघडतो आणि आम्हाला आमचे डोके त्याच्या ताब्यात देतो असे बऱ्याच ग्राहकांनी फोनवरही सांगितले आहे. केस, दाढी वाढवून बसलेले आमचे ग्राहक आम्हाला पाहवत नाहीत, पण आमच्या ग्राहकांची, सर्व देशवासीयांची आणि आमची काळजी घेण्याच्या दृष्टीने सध्या सलूनधंदा बंद ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळे कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे.
                       महाराष्ट्र राज्याचे नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्याशी फोनसंपर्क केला असता त्यांनी असे सांगितले कि प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन काटेकोरपणे पालन करावे. ' मन कि बात ' हा आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकावा. घरी बसलेल्या नाभिक बांधवांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून ते आपल्या नाभिक बांधवांना नाराज करणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

Saturday, March 14, 2020

अमोल भंडारींसारखे आदर्श शिक्षक निर्माण व्हायला हवेत : सुहास पाताडे

शेर्पे दिनांक : १५/०३/२०२० :
            काही शिक्षक हे हाडाचे शिक्षक असतात. शिकवून विद्यार्थ्यांना शहाणे करणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून आणि पुरस्काराची अपेक्षा न बाळगता आपले शैक्षणिक काम अविरतपणे करत राहणे हे काम करणारे शेर्पे केंद्रातील सर्वांचे लाडके अमोल भंडारीगुरुजी यांना शेर्पे केंद्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी अमोल भंडारी यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्याला अनेक उत्तम शुभेच्छा दिल्या. तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या शुभहस्ते त्यांना आकर्षक प्रमाणपत्र , शाल ,श्रीफळ देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
            हा पुरस्कार केंद्राच्या वतीने देताना केंद्रात हिरीरीने काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले होते. अमोल भंडारी हे शेर्पे गावासारख्या कणकवलीपासून ४० किलोमीटर अंतरावरील दुर्गम भागात उपशिक्षक म्हणून काम करत आहेत. काही काळ त्यांना शेर्पे केंद्रशाळेत मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी पार पाडावी लागली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवनवीन उपक्रम प्रसिद्धीची हाव न बाळगता तडीस नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु केले. सन २०११ ते २०१५ अशी सलग ५ वर्षे त्यांनी आपल्या शाळेतील मुले गुणवत्ता यादीत आणली.
            यासाठी पालकांशी सतत जिव्हाळ्याचे संबंध ठेवून भंडारी यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. या पालकसंपर्क क्षमतेचा उपयोग अमोल भंडारी यांनी आपली शाळा अधिक प्रगतिशील बनवण्यासाठी प्रामुख्याने केला. प्रसंगी त्यांना सिंधदुर्गचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , सहकारी शिक्षक , ग्रामस्थ यांचे सहकार्य घ्यावे लागले. अमोल भंडारी म्हणतात कि माझ्या आणि मुलांच्या विकासामध्ये सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ पालकांचा मोलाचा वाटा आहे.
            अमोल भंडारी यांनी २०१६ मध्ये राज्यशास्त्र विषयातून सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापक होण्यापर्यंतची शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता वाढवली आहे. हे करत असताना त्यांना त्यांच्या कुटुंबाची व पत्नीचीही अनमोल साथ लाभली असे सांगायलाही ते विसरत नाहीत. अशा हाडाच्या शिक्षकाचा सन्मान झाल्याबद्दल शेर्पे केंद्रातील सर्व अधिकारी व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Thursday, March 12, 2020

सीताराम पारधिये यांना साळीस्ते केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

साळीस्ते : दिनांक : १२ मार्च २०२० :
               शिक्षक हा शीलवान , क्षमाशील आणि कलाकार असावा लागतो असे म्हणतात. साळीस्ते नं. १ शाळेतील पदवीधर शिक्षक सीताराम दत्ताराम पारधिये यांच्याबद्दल असेच म्हणावे लागेल. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना नुकताच ' केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
              साळिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख सदगुरु अनंत कुबल यांच्या संकल्पनेतून साळिस्ते केंद्रात हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप फोटोफ्रेम प्रमाणपत्र, शाल ,श्रीफळ ,गुलाब पुष्प असे होते. हा पुरस्कार सोहळा साळिस्ते नं. १ च्या  वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे औचित्य साधून तळेरे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी कणकवली पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
             उपक्रमशील पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये यांनी शालेय विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा,  सहशालेय उपक्रम,  ज्ञानी मी होणार स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, परसबाग स्पर्धा, उत्कर्षा कार्यक्रम यात कणकवली तालुक्यात अव्वल दर्जाचे कार्य केले आहे. त्याबद्दल सुहास पाताडे, सद्गुरू कुबल , सत्यवान घाडीगावकर यांनी गौरवोद्गार काढले. दिलीप तळेकर यांनीही केंद्रप्रमुख कुबल यांच्या संकल्पनेबद्दल कौतुक केले. या सन्मान सोहळ्याला साळीस्ते सरपंच मैथिली कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष ताम्हणकर , उपाध्यक्षा प्रेमलता गुरव , चंदूशेठ हरयाण , मंगेश कांबळे, अनिल ताम्हणकर, प्रभाकर ताम्हणकर, गोपाळ चव्हाण, साळीस्ते कांजीरच्या मुख्याध्यापिका पिसे , दिपक गुरव, संगीता वळवी, माधवी बुचडे , रवींद्र पाष्टे आणि बहुसंख्य पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.